Friday, April 13, 2012

लेखन.....


लेखन, कसे बरे घडते लेखन. नेहमीच काही सुचतं असं नाही. हा प्रत्येकाचाच अनुभव असतो की प्रत्यक्षात लिखाण करूया असं म्हणून लिहायला बसलो की सगळ्या शब्द्सृष्टीलाच जणू टाळे लागल्यासारखे होते. एक शब्द सुचेल तर हराम. मग लेखन कसे घडते तर ती एक अंतःप्रेरणा असते जी आपल्या वाचनाचा,अनुभवांचा साज चढवून ,कल्पनेच्या जगातले मोती जमवून , भावनांचा स्पर्श घेऊन अवतरते. ती प्रेरणा सुद्धा कशी तर वीज चमकावी तशी क्षणिक असते पण तेव्हाच तिला टिपता आले, शब्दात बंदिस्त करता आले तर अहाहा! मग ती जी काय कलाकृती घडते ती केवळ अप्रतिमच....

पण या सगळ्याचे नेमके कारण काय असावे असे मनात काय घडत असावे की ज्याने लेखनास आपण चेतवले जातो... त्याबद्दल हे माझेच मला गवसलेले उत्तर........

"मी एकटाच भटकत असतो माझ्या विश्वात..... आणि फिरत असतो कुठल्याश्या अज्ञाताच्या शोधात.........
कधी आनंदाचा वारा अंगात फोफावतो आणि मी त्या बरोबर फुलपाखरू बनून उडत असतो.........
तर कधी मध्येच दुःखाची उबळ येते आणि मी माझ्याच मनातल्या कुठल्याश्या निष्पर्ण वृक्षावर एकाक्षाप्रमाणे बसून राहतो ..........
कधी मन सरोवरात सुंदरशा कमळीणी फुलून येतात  तर कधी परिस्थितीचे मत्त गज त्या सरोवरात हैदोस घालतात......
कधी आपणच या विश्वाचा मालक असे वाटत राहते ........ मध्येच कधी भिकार्याहून भिकारी असे सुद्धा वाटते......
कधीका?, कसेकायअशा प्रश्नांचे तांडव माजते....... आणि कधी क्वचित उकलींची मालिकाही सजते..........
मनात कधी दिसते मी माझ्याच चितेला देतो आहे आग ................
आणि कधी कधी चीरंजीवितेचे चोहीकडे घुमत राहतात राग .........
मी हे सारे मनाचे खेळ एकटाच पाहत बसलेला असतो.........त्या विश्वाचा तेव्हा मीच एकटा साक्षीरुप असतो .....
हे सारे कधीतरी एका क्षणी शब्दरूप घेऊन मनातून बाहेर येते......
आणि माझ्या लेखणीतून सहज आकारा येते........."





genius_pankaj


Sunday, April 1, 2012

प्रारंभ लेखनाचा......



दिसामाजी काहीतरी ते लिहावे
         प्रसंगी अखंडित वाचीत जावे ..........

असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात.......

वाचन तर नेहमी चालूच असते पण खास लिखाण असे कधी घडले नव्हते, म्हणजे चार ओळी कागदावर कधी खरडल्याही असतील पण ते तेवढे तेवढ्यापुरतेच, खास असे बसून कोणत्यातरी खास कारणास्तव लिहावे असे कधी घडले नव्हते. 


पण गेल्या दोन दिवसांत अचानक काही blogs वाचनात आले त्यातील एका blog ने तर फारच प्रभाव पाडला... आणि मग वाटले अरे असे काहीतरी हलकेफुलके ,सोपे,सहज, साधेसरळ आपणही काही लिहू शकतो. त्यामुळे मग राहून राहून वाटायला लागलं की आपणही कुठेतरी सुरुवात करावी..... 


आज लिखाण सुरु करावे अशी अगदी अंतःप्रेरणा झाल्यासारखेच झाले आणि योगायोग तरी काय म्हणावा आज नेमकी रामनवमी अगदी चांगला दिवस, कवितांच्या बाबतीतही तसेच काहीसे घडले आणि त्या दिवशी नेमकी विजयादशमी होती, असो ......  मग काय आज म्हटले एकदाचे होऊनच जाऊंदे....... लिखाण चांगले असूंदे अथवा वाईट...... तंत्रज्ञान उपलब्ध आहे ना आपले मतप्रदर्शन करण्यास , मग फायदा घ्यावा...... 


लिखाण उत्तम दर्जाचे,वाचनीय, मनोवेधक असेलच असे नाही पण तरीही "नदी चांगले पाणी घेऊन वाहत असली म्हणून काय नाले वाहायचे थांबतात , अशीही मग एक वेळ येते की हे नदीचे पाणी आणि हे नाल्याचे पाणी असे भिन्न दाखवता येत नाही. " .. ... लिखाणाचेही तसेच आहे इतर सारे चांगले लिहितात म्हणून आपण काय लिहिणे टाकायचे..... आणि मग अशीही एक वेळ येईल की शुल्लक लिहिता लिहिता दर्जेदार लिहिता येऊ लागेल......... म्हणून आज ही छोटीशी सुरुवात..... आता पुढे बघूया... भले शब्दांचे महाल उभारता नाही येणार पण तरी एखादी चंद्रमौळी वास्तू नक्कीच उभारू...............


genius_pankaj