लेखन, कसे बरे घडते लेखन. नेहमीच काही सुचतं असं नाही. हा प्रत्येकाचाच अनुभव असतो की प्रत्यक्षात लिखाण करूया असं म्हणून लिहायला बसलो की सगळ्या शब्द्सृष्टीलाच जणू टाळे लागल्यासारखे होते. एक शब्द सुचेल तर हराम. मग लेखन कसे घडते तर ती एक अंतःप्रेरणा असते जी आपल्या वाचनाचा,अनुभवांचा साज चढवून ,कल्पनेच्या जगातले मोती जमवून , भावनांचा स्पर्श घेऊन अवतरते. ती प्रेरणा सुद्धा कशी तर वीज चमकावी तशी क्षणिक असते पण तेव्हाच तिला टिपता आले, शब्दात बंदिस्त करता आले तर अहाहा! मग ती जी काय कलाकृती घडते ती केवळ अप्रतिमच....
पण या सगळ्याचे नेमके कारण काय असावे असे मनात काय घडत असावे की ज्याने लेखनास आपण चेतवले जातो... त्याबद्दल हे माझेच मला गवसलेले उत्तर........
"मी एकटाच भटकत असतो माझ्या विश्वात..... आणि फिरत असतो कुठल्याश्या अज्ञाताच्या शोधात.........
कधी आनंदाचा वारा अंगात फोफावतो आणि मी त्या बरोबर फुलपाखरू बनून उडत असतो.........
तर कधी मध्येच दुःखाची उबळ येते आणि मी माझ्याच मनातल्या कुठल्याश्या निष्पर्ण वृक्षावर एकाक्षाप्रमाणे बसून राहतो ..........
कधी मन सरोवरात सुंदरशा कमळीणी फुलून येतात तर कधी परिस्थितीचे मत्त गज त्या सरोवरात हैदोस घालतात......
कधी आपणच या विश्वाचा मालक असे वाटत राहते ........ मध्येच कधी भिकार्याहून भिकारी असे सुद्धा वाटते......
कधी, का?, कसे? काय? अशा प्रश्नांचे तांडव माजते....... आणि कधी क्वचित उकलींची मालिकाही सजते..........
मनात कधी दिसते मी माझ्याच चितेला देतो आहे आग ................
आणि कधी कधी चीरंजीवितेचे चोहीकडे घुमत राहतात राग .........
मी हे सारे मनाचे खेळ एकटाच पाहत बसलेला असतो.........त्या विश्वाचा तेव्हा मीच एकटा साक्षीरुप असतो .....
हे सारे कधीतरी एका क्षणी शब्दरूप घेऊन मनातून बाहेर येते......
आणि माझ्या लेखणीतून सहज आकारा येते........."
genius_pankaj
