Saturday, June 2, 2012

मास्टरपीसच्या शोधात...



असे कधी होते का, की तुम्ही काहीतरी लिहिता, एखादी कलाकृती सादर करता, एखादे गाणे म्हणता किंवा एखादा पदार्थ बनवता, त्यावेळी वाटतं की काय झकास जमले आहे पण मग काही दिवसांनी वाटतं की अरे जे काही करायचे होते ते हे नव्हे. कुठेतरी काहीतरी राहून गेले आहे. मनात अशी एक सुप्त संवेदना उमटते की हवे तसे नाहीच जमले. आपणांस हवे ते हे नाहीच किंबहुना आपण ज्या गोष्टीच्या शोधात आहोत ते हे नक्कीच नव्हे. तो मास्टरपीस अजून गवसला नाहीच .

माझेतरी असेच होते कधीकाळी काही लिहिले की वाटते अरे शिरवाडकर,खांडेकर आपल्यासमोर काहीच नाहीत. पण नंतर काही दिवसांनी वाटते की काय शुल्लक दर्जाचे लिहिले आहे. मग मनात विचार येतो की मोठमोठ्या हस्तींना सुद्धा असा प्रश्न पडत असेल कातर हो खरच पडत असणार एखाद्या एम. एफ. हुसैन सारख्या चित्रकाराला वाटतच असणार मास्टरपीस अजून चित्तारलेला नाही किंवा एखाद्या लतादीदी सारखीला वाटतच असणार की अजून तो मास्टरपीस म्हणावा असा सूर गवसलेला नाही. 

खुद्द तानसेनाची एकदा बादशाहने स्तुती केली होती आणि म्हटले होते की वाह तुझी गायकी काही औरचतेव्हा तानसेन म्हणाला होता की छे हे काहीच नाहीमी इतके गायलो आणि गातो आहे पण माझ्या गुरूंचा जो सूर लागतो तो अजून मला जमलेला नाही आणि हे फक्त गायकीच्या बाबतीतच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात अनुभवायला मिळते. मी शांता शेळके यांच्या कविता वाचून हरखून जायचो. इतक्या अत्युत्तम कविता की भान हरपायचे. पण एकदा त्यांचेच बोलणे ऐकून मी चाट पडलो. त्यांना कुणीतरी विचारले की इतक्या उत्तम कविता तुम्हाला कशा जमतात. तेव्हा त्या म्हणाल्या या कसल्या कविताआपण करतो त्या केवळ रचना असतातशब्दांची बांधाबांध, खऱ्या कविता फक्त संतांनाच जमतात. म्हणजे परत तोच भावपरत तीच अपूर्णत्वाची जाणीव. 

असे का बरे होत असेल कितीही केले तरी अपूर्णत्व का जाणवावे. मला वाटतं हे अपूर्णत्वच काहीतरी अजून उत्कृष्ट करण्याची प्रेरणा करत असावे. देवाने हा अपूर्णत्वाचा जणू आशीर्वादच दिला असावा. पहा ना कुणीतरी म्हटलंच आहे की एखाद्या पर्वताच्या शिखरावर चढल्यावर पुढे काहीच नसतेअसलीच तर खोल दरी असते. म्हणून माझ्यामते तरी हे अपूर्णत्व माणसाला त्याच्या यशाच्या अंतिम शिखरावर न नेता नित्य यशाकडे जाणाऱ्या त्या मार्गावर ठेवत असावे आणि मग हेच अपूर्णत्व नवनवीन काही उदयास आणत असावे. किंबहुना हे अपूर्णत्वच माणसाच्या अस्तित्वाचे जिवंतपणाचे द्योतक असावे.

एकदा का तो मास्टरपीस गवसला की संपलेच सगळे. कारण पुढे मग काहीच करावयास उरणार नाही.जसे पुराणात म्हटले आहे की अमृतसेवन एकदा केले की मग कुठल्याच रसाची गोडी लागत नाही. तसेच एकदा का आयुष्यातला मास्टरपीस गवसला की पुढे काहीच करण्याची इच्छा राहणार नाही . पण असे कधी प्रत्ययास आले नाही म्हणून तर हे जग चालले आहे. रोज नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत, रोज नवी साहित्य निर्मिती होत आहे, रोज नवे शोध लागत आहेत रोज काही ना काही उदयास येतच आहे. 

इतरांचे यावर काय मत असेल मला ठाऊक नाही पण मला तरी असे वाटते की तो मास्टरपीस ते पूर्णत्व क्वचितच कुणास लाभत असावे. नाहीतर एरव्ही प्रत्येक मनुष्य अथ पासून इति पर्यंत चाल चालत असतो त्याच्या आयुष्यातील मास्टरपीसच्या शोधात...






genius_pankaj

Tuesday, May 1, 2012

"महाराष्ट्र दिन"

आज १ मे ,२०१२ . महाराष्ट्र दिन. अखिल मराठी बांधवांसाठी अभिमानाचा दिन. कारण बरोबर ५२ वर्षांपूर्वी म्हणजे १९६० साली याच दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. पण बोलण्यास जितके सोप्पे तितक्या साध्या सरळ रीतीने महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नाही. तर अनेक हुतात्म्यांचे रक्त सांडून, अनेकांना तुरुंगवास भोगवून , बरेचसे लांच्छनास्पद बोलणे सोसून हे सगळे घडले.मोठी चळवळ उभारावी लागली तेव्हा कुठे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. आमुचा महाराष्ट्र म्हणजे मत्त राजकारण्यांशी झुंज देऊन , खेचून आणलेली विजयश्री आहे.

हिंदुस्थान स्वतंत्र झाला तेव्हा घटनेने इंग्रजांनी केलेली प्रांत रचनाच स्वीकारली ती अवघ्या देशाला ,खासकरून दक्षिण्यांना रुचली नाही. तेव्हा सरकारने फाजलअली आयागोची ,राज्य पुनर्रचनेसाठी नियुक्ती केली.पण या आयोगाने मराठी भाषिकांवर फारच अन्याय केला. मुंबई, बेळगाव,कारवार,विदर्भ,निपाणी,डांग,बिदर अशा साऱ्या प्रांतांना महाराष्ट्र राज्यापासून वेगळे करण्यात आले. कारणे काय तर म्हणे मुंबईचा विकास गुजराती बांधवांनी केला आहे त्यामुळे मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने ती गुजरातेत राहणे योग्य आहे. बेळगाव हे कर्नाटकाला आर्थिकदृष्ट्या जोडलेले आहे आणि विदर्भ महाराष्ट्रात टाकला तर नागपूरचे महत्व कमी होईल. म्हणजे एकीकडे भाषावार प्रांतरचना असे ओरडायचे आणि दुसरीकडे महाराष्ट्र प्रांताची शकले उडवायची. झाले , मराठी जनता पेटून उठली आणि एक "संयुक्त महाराष्ट्र चळवळ " उभी राहिली. चळवळीचे घोषवाक्य होते "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे".

तेव्हाचे राज्यकर्ते होते "काँग्रेस". त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील साऱ्या काँग्रेस नेत्यांनी हात वर केले. मग या चळवळीचे नेतृत्व केले ते सेनापती बापट,आचार्य अत्रे,श्रीपाद डांगे,एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे अशा थोर व्यक्तींनी. सेनापती बापटांचे काय ते जळजळीत बोलणे, आणि तितकीच अत्र्यांची खोचक टीका , प्रबोधनकारांचे काठीचे रट्टे ओढावे तसे लिखाण याने तेव्हाचे राज्यकर्ते तर नक्कीच जायबंदी झाले असणार. असे म्हणतात की कुठल्याही पक्षाच्या अथवा एखाद्या सत्ताधीशाच्या पाठिंब्याशिवाय , मदतीशिवाय उभी राहिलेली ही पहिलीच चळवळ होती. लोकांनीच उभी केलेली , जनशक्ती काय असते ती दाखवून देणारी ही एक भव्य चळवळ होती.

तिकडे नेहरू, मोरारजी देसाई यांसारखे राज्यकर्ते नकाराच्या हट्टाने पेटलेले तर इकडे महाराष्ट्रीय जनता होकारासाठी तितकीच चवताळून उठलेली. मुंबईत झालेल्या एका सभेत तर मोरारजी देसाई म्हणाले "काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही." , तेव्हाच आणखीन एक नेते स.का. पाटील म्हणालेले "पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही." पण मराठी जनतेचा निश्चय सुद्धा काही वाऱ्यावर डोलणाऱ्या डोलकाठी प्रमाणे नव्हता तर तो एखाद्या उत्तुंग पर्वत शिखराप्रमाणे पाय या जमिनीत रोवून उभा होता.

आधीच सरकारच्या पक्षपाती धोरणांतून जनतेत प्रक्षोभ होता त्यात भर म्हणून सरकारने १९५६ साली मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केले. त्यामुळे तर संतापाचा अधिकच भडका उडाला. लोक रस्त्यावर उतरले. उपोषणे, सत्याग्रह, मोर्चे, आंदोलने होऊ लागली. मोरारजी देसाईनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करवला त्यात एकूण १०५ जण हुतात्मा झाले. आता सारे महाराष्ट्रीय इरेला पेटले होते. संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्ली येथे प्रचंड सत्याग्रह घडवून आणला. जनतेचा असंतोष इतका वाढला होता की महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांना सुरक्षा रक्षकांसोबत फिरावे लागे.

अशात १९५७ साली सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि संयुक्त महाराष्ट्र समितीला भरघोस यश मिळाले काँग्रेसची बरीच पडझड झाली. जनतेचा वाढता प्रक्षोभ आणि त्याचे सरकारवर वाढणारे दडपण , आगाऊ होणाऱ्या निवडणुकांचा विचार या सर्व पार्श्वभूमीवर शेवटी सरकारला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मान्य करावाच लागला. या नुसार विदर्भ,मुंबई असे प्रांत महाराष्ट्रात आले. मुंबई , गुजराती बांधवाना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून ५० कोटी व्याज देऊन महाराष्ट्रात आली. बेळगाव, कारवार ,निपाणी मात्र शेवटी महाराष्ट्रात येऊ शकले नाही. तो प्रश्न अजूनसुद्धा टांगणीवर असल्याचे आपण पाहतच आहोत.

शेवटी राज्याचे नाव "महाराष्ट्र" असे निश्चित करण्यात आले आणि त्याची स्थापना कामगारदिनी म्हणजे १ मे १९६० रोजी करण्यात आली.

असा हा इतिहास इथल्या शब्दमर्यादेपायी थोडक्यात मांडला पण असा हा सारा इतिहास कालपरवापर्यंत मलासुद्धा ठाऊक नव्हता. पण एकदिवस असेच google वर कोणत्यातरी कारणाने महाराष्ट्र चळवळीचा पत्ता लागला आणि मग शोध घेतल्यावर बरंच ऐकायला आणि वाचायला मिळालं आणि वाटलं की खरच माझ्या पिढीला या लढ्याची जास्त माहिती वा जाणीव असेल का? कारण आजच्या छानछोकीच्या जमान्यात कोण कशाला इतिहासाची दारे ठोठावेल आणि विचारेल की खरच का आमचे वारसदार असे लढले असा उज्वल इतिहास खरच का घडला? १ मे म्हणजे नाहीतरी उन्हाळ्यातलाच दिवस ,तेव्हा मस्त एक छान सुट्टी मिळते झाले. बाकी कशाला काय करायचे आहे. पण असा विचार किती शुल्लक आहे हे तेव्हाच कळते जेव्हा हे सारे अनुभवता येते, सोसले जाते. सुदैवाने आपल्याला असा काही जास्त त्रास सोसावा लागत नाहीये. छान जीवन जगता येतं आहे. तेव्हा त्या हुतात्म्यांची , त्या संघर्षाची या दिवसाच्या निमित्ताने निदान आठवण तरी काढू , त्यांना क्षणभर सलाम तरी करू, त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना धन्यवाद तरी देऊ आणि त्यांना मनोमन हे तरी सांगू की "मला तुमचा अभिमान आहे" . त्यासाठी केलेले हे थोडेसे लेखन. शेवटी एकच म्हणेन,

"जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा "





genius_pankaj





Friday, April 13, 2012

लेखन.....


लेखन, कसे बरे घडते लेखन. नेहमीच काही सुचतं असं नाही. हा प्रत्येकाचाच अनुभव असतो की प्रत्यक्षात लिखाण करूया असं म्हणून लिहायला बसलो की सगळ्या शब्द्सृष्टीलाच जणू टाळे लागल्यासारखे होते. एक शब्द सुचेल तर हराम. मग लेखन कसे घडते तर ती एक अंतःप्रेरणा असते जी आपल्या वाचनाचा,अनुभवांचा साज चढवून ,कल्पनेच्या जगातले मोती जमवून , भावनांचा स्पर्श घेऊन अवतरते. ती प्रेरणा सुद्धा कशी तर वीज चमकावी तशी क्षणिक असते पण तेव्हाच तिला टिपता आले, शब्दात बंदिस्त करता आले तर अहाहा! मग ती जी काय कलाकृती घडते ती केवळ अप्रतिमच....

पण या सगळ्याचे नेमके कारण काय असावे असे मनात काय घडत असावे की ज्याने लेखनास आपण चेतवले जातो... त्याबद्दल हे माझेच मला गवसलेले उत्तर........

"मी एकटाच भटकत असतो माझ्या विश्वात..... आणि फिरत असतो कुठल्याश्या अज्ञाताच्या शोधात.........
कधी आनंदाचा वारा अंगात फोफावतो आणि मी त्या बरोबर फुलपाखरू बनून उडत असतो.........
तर कधी मध्येच दुःखाची उबळ येते आणि मी माझ्याच मनातल्या कुठल्याश्या निष्पर्ण वृक्षावर एकाक्षाप्रमाणे बसून राहतो ..........
कधी मन सरोवरात सुंदरशा कमळीणी फुलून येतात  तर कधी परिस्थितीचे मत्त गज त्या सरोवरात हैदोस घालतात......
कधी आपणच या विश्वाचा मालक असे वाटत राहते ........ मध्येच कधी भिकार्याहून भिकारी असे सुद्धा वाटते......
कधीका?, कसेकायअशा प्रश्नांचे तांडव माजते....... आणि कधी क्वचित उकलींची मालिकाही सजते..........
मनात कधी दिसते मी माझ्याच चितेला देतो आहे आग ................
आणि कधी कधी चीरंजीवितेचे चोहीकडे घुमत राहतात राग .........
मी हे सारे मनाचे खेळ एकटाच पाहत बसलेला असतो.........त्या विश्वाचा तेव्हा मीच एकटा साक्षीरुप असतो .....
हे सारे कधीतरी एका क्षणी शब्दरूप घेऊन मनातून बाहेर येते......
आणि माझ्या लेखणीतून सहज आकारा येते........."





genius_pankaj


Sunday, April 1, 2012

प्रारंभ लेखनाचा......



दिसामाजी काहीतरी ते लिहावे
         प्रसंगी अखंडित वाचीत जावे ..........

असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात.......

वाचन तर नेहमी चालूच असते पण खास लिखाण असे कधी घडले नव्हते, म्हणजे चार ओळी कागदावर कधी खरडल्याही असतील पण ते तेवढे तेवढ्यापुरतेच, खास असे बसून कोणत्यातरी खास कारणास्तव लिहावे असे कधी घडले नव्हते. 


पण गेल्या दोन दिवसांत अचानक काही blogs वाचनात आले त्यातील एका blog ने तर फारच प्रभाव पाडला... आणि मग वाटले अरे असे काहीतरी हलकेफुलके ,सोपे,सहज, साधेसरळ आपणही काही लिहू शकतो. त्यामुळे मग राहून राहून वाटायला लागलं की आपणही कुठेतरी सुरुवात करावी..... 


आज लिखाण सुरु करावे अशी अगदी अंतःप्रेरणा झाल्यासारखेच झाले आणि योगायोग तरी काय म्हणावा आज नेमकी रामनवमी अगदी चांगला दिवस, कवितांच्या बाबतीतही तसेच काहीसे घडले आणि त्या दिवशी नेमकी विजयादशमी होती, असो ......  मग काय आज म्हटले एकदाचे होऊनच जाऊंदे....... लिखाण चांगले असूंदे अथवा वाईट...... तंत्रज्ञान उपलब्ध आहे ना आपले मतप्रदर्शन करण्यास , मग फायदा घ्यावा...... 


लिखाण उत्तम दर्जाचे,वाचनीय, मनोवेधक असेलच असे नाही पण तरीही "नदी चांगले पाणी घेऊन वाहत असली म्हणून काय नाले वाहायचे थांबतात , अशीही मग एक वेळ येते की हे नदीचे पाणी आणि हे नाल्याचे पाणी असे भिन्न दाखवता येत नाही. " .. ... लिखाणाचेही तसेच आहे इतर सारे चांगले लिहितात म्हणून आपण काय लिहिणे टाकायचे..... आणि मग अशीही एक वेळ येईल की शुल्लक लिहिता लिहिता दर्जेदार लिहिता येऊ लागेल......... म्हणून आज ही छोटीशी सुरुवात..... आता पुढे बघूया... भले शब्दांचे महाल उभारता नाही येणार पण तरी एखादी चंद्रमौळी वास्तू नक्कीच उभारू...............


genius_pankaj